1. घोडा आणि नदी

एकदा एका माणसाला त्यच्या घोड्यासमवेत एक नदी पार करायची असते. परंतु त्याला नदीची खोली माहीत नसल्याने तो तिथेच काठावर विचार करत बसतो. मदतीसाठी आजुबाजुला पाहत असताना त्याला तेथे एक लहान मुलगा दिसतो. तेव्हा त्या माणसाने लहान मुलाला नदीच्या खोलीबद्दल विचारले. मुलाने घोड्याकडे एकदा पाहीले आणि क्षणभर थांबुन तो विश्वासाने म्हणाला, " निश्चींतपणे जा, तुमचा घोडा नदी सहज पार करु शकेल".मुलाचा सल्ला मानुन त्या माणसाने नदी पार करण्यास सुरुवात केली. परंतु नदीच्या मध्यावर पोहोचल्यावर त्याच्या लक्षात आले की नदी खुप खोल आहे. आणि तो जवळ जवळ बुडायलाच आला.कसाबसा तो त्यातून सावरला आणि बाहेर येउन त्या मुलावर जोरात खेकसला. मुलगा पुरता घाबरला होता आणि घाबरत घाबरतच बोलला, "पण माझी बदके तर खुप लहान आहेत आणि ते दररोज नदी पार करतात. त्यांचे पाय तर तुमच्या घोड्यापेक्षा खुप लहान आहेत.
" उगाच कोणाचाही सल्ला ऐकण्याआधी त्यांना खरोखरच काही माहीती आहे का ते जाणुन घ्या...


2. एकीचे बळ मोठे असते

एका जातक कथेतील वर्णनानुसार वाराणसीलगत एका गावातील एक सुतार रोज जंगलात जात असे. एकदा त्याने खड्डय़ात पडलेल्या जंगली कुत्र्याच्या पिल्याचा जीव वाचवला तेव्हापासून त्याला त्या पिलाचा लळा लागला. ते पिलू त्याला तेथे भेटत होते. ते पाहून इतरही जंगली कुत्रे त्याच्याजवळ येत असत. परंतु त्यांना सर्वाना एका वाघाने फार त्रस्त करून सोडले होते. तो रोज त्यांच्यावर हल्ले करत होता. सुताराने एक योजना बनविली. नेहमीप्रमाणे वाघ डोंगराच्या माथ्यावर आला. सर्व कुत्री वेगवेगळ्या ठिकाणी थांबून त्याच्यावर भुंकू लागली. वाघाने चवताळून एका कुत्र्यावर झेप घेतली तसा तो कुत्रा खाली बसला. वाघाची उडी थेट त्या कुत्र्याच्या मागे असणार्‍या एका मोठय़ा खड्डय़ात पडली. सगळ्या कुत्र्यांनी त्याच्यावर धाव घेतली व त्याच्यावर हल्ला करून त्याला ठार केले.
तात्पर्य : एकीचे बळ मोठे असते.


3.संतोष व समाधान हेच खरे धन

एका श्रीमंत माणसाजवळ अमाप धन होते. तरीही त्याला समाधान नव्हते. एके दिवशी एक साधू त्या गावात आला. श्रीमंत माणसाने त्याची बरीच कीर्ती ऐकली. तो त्याच्याकडे गेला. आपली मनोव्यथा त्याला सांगितली. 'मला सात पिढय़ा पुरेल एवढी संपत्ती हवी आहे,' अशी मागणी त्याने त्या योगी पुरुषाकडे केली. त्या संत पुरुषाने श्रीमंत माणसाला आपादमस्तक न्याहाळले व ते म्हणाले, 'तुझ्या घराजवळ एक झोपडे आहे. त्यात एक म्हातारी राहते. त्या म्हातारीला पुरेल एवढा शिधा फक्त तू नेऊन दे. तुझ्या संपत्तीत पाहिजे तेवढी वाढ होईल.' दुसर्‍या दिवशी सकाळी श्रीमंत माणूस त्या झोपडीत गेला व म्हातारीला म्हणाला, 'तुझ्यासाठी मी पीठ, साखर, डाळ, तूप अशा वस्तू आणल्या आहेत. त्यांचा स्वीकार व्हावा.' म्हातारीने नम्रतापूर्वक उत्तर दिले, 'आज खाण्यासाठी पुरेल एवढी सामग्री आमच्याकडे आहे. त्यामुळे तू देत असलेल्या खाद्य वस्तूंची आम्हाला गरज नाही.' मग आपण उद्यासाठी म्हणून त्याचा स्वीकार करावा.' श्रीमंत माणूस उद्गारला, 'अंगण साफ करणारी म्हातारीची सून उद्गारली, 'आम्ही कोणत्याही गोष्टीचा संग्रह करून ठेवत नाही. उद्याची आम्हाला काळजी नसते. आमचे रोजचे जेवण आम्हाला व्यवस्थित मिळत राहते.' ते ऐकून श्रीमंत माणूस चकित झाला. 'उद्याची काळजी न करणारे हे लोक कोठे आणि सात पिढय़ांची काळजी करणारा मी कोठे?' असा विचार त्याच्या मनात आला. संतोष व समाधान हेच खरे धन, ही दृष्टी त्याला मिळाली.


4.उपकार वाघासारख्यावर करावे

एकदा एक वाघ आणि वाघीण आपल्या पिलांना गुहेत सोडून शिकारीसाठी दूर जंगलात जातात. खूप दिवस पर्यंत ते परत येत नाही. इकडे पिलांना खूप भूक लागू लागते. कलकल ऐकून एका बकरीला त्यांची दया येते. ती वाघिणीच्या पिलांना आपले दूध पाजते. तेव्हा पिलांच्या जीवात जीव येतो.आता बकरी रोज येऊन त्यांना दूध पाजू लागते. एक दिवस पिले पोट भरल्यानंतर मस्ती करत असतानच तिथे वाघ आणि वाघीण परत येतात. बकरीला पाहून आयती शिकार मिळाल्याच्या आनंदात तिच्यावर वाघ झडप घालणार इतक्यात पिले म्हणतात, हिने आम्हाला दूध पाजून मोठे केलेय. ही नसती तर आम्ही मरून गेलो असतो. हिचे आपल्यावर खूप उपकार आहेत. तुम्ही तिला मारू नका. मुलांचे ऐकून वाघ खुश होता आणि तिला कृतज्ञतेने म्हणतो. आम्ही तुझे हे उपकार विसरणार नाही. आता तू स्वतंत्रपणे आनंदाने जंगलात एकटी सुद्धा वावरू शकतेस. तुला कुणीही त्रास देणार नाही.आता बकरी मोठ्या धाडसाने जंगलात कुठेही वावरू लागते. एकदा तर बकरीला वाघाच्या पाठीवर बसून उंच झाडांची पाने खाताना एका पक्ष बघतो आणि कुतूहलाने बकरीला त्याबद्दल विचारतो. बकरी त्या मोठ्या पक्षाला सर्व हकीकत सांगते. उपकाराचे महत्त्व पक्षाच्या लक्षात आल्यावर आपण पण असेच महान कार्य करायचे असं पक्षी ठरवतो. एकदा पक्षी उडत असताना त्याला काही उंदराची पिले दलदलीत फसलेली दृष्टीस पडतात. ती बाहेर पडायचा प्रयत्न करत असतात पण अधिकच खोल जात असतात. पक्षी त्यांना अलगद बाहेर काढतो. उंदराची पिले ओली झालेली असतात. थंडीने कुडकुडत असतात. पक्षी त्यांना आपल्या पंखात घेतो. चांगली ऊब देतो. थोड्या वेळाने आपल्या घरट्या कडे जाण्यासाठी निघतो. उंदराच्या पिलांचा निरोप घेतो. उडायचा प्रयत्न करतो पण काही केल्या त्याला उडता येत नाही कारण त्याचे पंख पिलांनी कुरतडलेले असतात.चरफडत चरफडत कसाबसा पक्षी तिथून निघतो.बकरीला भेटून विचारतो, "तू पण उपकार केलेस मी पण उपकार केले. पण फळ दोघांना वेगवेगळे कसे मिळाले?
"बकरी गंभीरपणे म्हणते "उपकार पण वाघासारख्यावर करावेत, उंदरा सारख्यावर नाही. कारण असे लोक नेहमी कामापुरते असून आपल्या स्वार्थाकरिता दुसरा पर्याया मिळाला की, सच्च्या व प्रामाणिक माणसाला ते विसरण्यातच त्यांची स्वभाव धन्यता मानतात आणि बहादूर लोक उपकार करण्यार्‍याला लक्षात ठेवतात".


5.बाह्य रूपावर जाऊन फसू नये

एका रानातल्या खडकावर दोन घोरपडी उन्ह खात बसल्या असता, त्यापैकी एकजण दुसरीस म्हणाली, 'आमची स्थिती मोठी शोचनीय आहे! आम्ही फक्त जिवंत आहोत एवढेच, बाकी सगळय़ा जगात आमच्याकडे कोणी ढुंकूनही बघत नाही. आमच्या क्षुद्रतेचा धिक्कार असो! यापेक्षा रानातल्या वार्‍यासारख्या उड्या मारणार्‍या हरणाचा जन्म मिळाला असता तर काय मजा आली असती!' हे बोलत असतानाच एका हरिणामागे लागलेल्या शिकारी कुत्र्याच्या भुंकण्याचा आवाज ऐकू आला व धावून थकलेल्या हरणाचा जीव कुत्र्याने घेतलेला तिने प्रत्यक्ष पाहिला. त्यावेळी दुसरी घोरपड आपल्या स्थितीविषयी कुरकुरणार्‍या पहिल्या घोरपडीस म्हणाली, 'ज्या हरणाचे जीवन आपल्याला मिळावे अशी इच्छा तू करीत होतीस त्या हरणाची स्थिती किती भयंकर आहे, हे आता प्रत्यक्षच पाहा अन् ज्या मोठेपणाबरोबर अनेक दु:खेही भोगावी लागतात, तो मोठेपणा देवाने आपणास दिला नाही याबद्दल त्याचे आभार मान!'
तात्पर्य - बाह्य रूपावर जाऊन फसू नये. कारण त्याच्या अंतर्यामी दु:ख असण्याचीच शक्यता असते.


6.मूर्खाला उपदेश केला तर..

एकदा हिमालयाच्या भागात एक वानर पावसात सचैल भिजल्याने थंडीने कुडकुडत एका झाडाखाली बसला होता. त्याच झाडावर एका घरट्यात एक पक्षी राहात होता.कुडकुडणार्‍या वानराला बघून त्याने म्हटले, 'अरे, आम्ही केवळ चोचीने घरटे बांधतो. तुला तर माणसासारखे हात-पाय आहेत. डोके आहे. असे असताना राहायला घरकुल का बांधत नाही तू? बांधले असतेस तर उघड्यावर अशी कुडकुडत बसण्याची पाळी आली नसती तुझ्यावर.''माणसासारखे हात-पाय आहेत मला, पण..' वानर कुरकुरला, पण माणसासारखी कामगिरी आम्हाला कुठली जमायला? आमचे डोके तेवढे नाही काम करत.''त्याचे काय आहे..' पक्षी बोलला, 'ज्याचे मन चंचल असते, जो दुसर्‍याच्या कुचेष्टा करण्यात वेळ दवडतो, त्याच्या हातून विधायक स्वरूपाचे काम होत नाही. यासाठीच दुसर्‍याला त्रास देण्याची प्रवृत्ती तू सोडून द्यायला हवीस. मग जिद्दीने, चिकाटीने स्वत:च्या निवार्‍यासाठी घरकुल बांधता येईल तुला.'उपदेश ऐकायची सवय नसलेल्या वानराला आला वैताग. तो चिडून, दात विचकत बोलला, 'घरट्यात बसून मारे उपदेश करायला काय जाते तुझे? तू समजतोस कोण स्वत:ला? थांब, माझा इंगाच दाखवतो तुला.'आणि झरझर झाडावर चढून त्या वानराने पक्ष्याचे घरटेच विस्कटून टाकले. 
दुष्ट स्वभावाच्या मूर्खाला आपण उपदेश करीत बसलो, म्हणून हा प्रसंग आपल्यावर ओढवला. हे तो पक्षी जाणून चुकला आणि 'स्वत:चं घर करवत नाही अन् दुसर्‍याने बनवलेले बघवत नाही,' असे मनाशी म्हणत तो पक्षी दूर उडून गेला.


7.वस्तूची किंमत मोठ्या आकारावरून ठरवायची नसते

एके ठिकाणी एक रेशमाचा किडा होता. तो एके दिवशी आपला रेशमी कोश विणत होता. त्यावेळी शेजारी एक कोळी होता. तो मोठय़ा चपळतेने आपले जाळे विणत होता. तो कोळी त्या किड्याकडे तिरस्काराने पाहून त्याला म्हणाला, 'अरे, माझ्या जाळ्यासंबंधी तुझे काय मतआहे? हे जाळे मी आज सकाळी प्रारंभ केले व आता ते अर्धेअधिक पुरेसुद्धा झाले. एवढे मोठे व इतके सुंदर जाळे मी इतक्या थोड्या वेळातविणले तरी तू आपला रेंगाळतच बसला आहेस.' त्यावर रेशमाचा किडा शांतपणे उत्तरला, 'अरे, तू वाटेल तेवढी बढाई मारलीस तरी तुझ्या वमाझ्या जाळ्यातील अंतर सगळ्यांना माहीत आहे. गरीब बिचार्‍या निरपराधी प्राण्यांना पकडण्यासाठी तू ते जाळे पसरले आहेस, त्याचेआयुष्य किती क्षणिक आहे बरे? एखाद्या मुलाने हे जाळे पाहिले तर तो एका क्षणात याचा नाश करून टाकेल. उलट माझ्या जाळ्यापासूनजे रेशीम निघेल, त्याची वस्त्रं पुढे एखाद्या राजाच्याही अंगावर बघावयास मिळतील.
तात्पर्य : कोणत्याही वस्तूची किंमत तिच्या मोठय़ा आकारावरून ठरवायची नसून, तिच्या उपयोगावरून ठरवायची असते.


7.वस्तूची किंमत मोठ्या आकारावरून ठरवायची नसते

एके ठिकाणी एक रेशमाचा किडा होता. तो एके दिवशी आपला रेशमी कोश विणत होता. त्यावेळी शेजारी एक कोळी होता. तो मोठय़ा चपळतेने आपले जाळे विणत होता. तो कोळी त्या किड्याकडे तिरस्काराने पाहून त्याला म्हणाला, 'अरे, माझ्या जाळ्यासंबंधी तुझे काय मतआहे? हे जाळे मी आज सकाळी प्रारंभ केले व आता ते अर्धेअधिक पुरेसुद्धा झाले. एवढे मोठे व इतके सुंदर जाळे मी इतक्या थोड्या वेळातविणले तरी तू आपला रेंगाळतच बसला आहेस.' त्यावर रेशमाचा किडा शांतपणे उत्तरला, 'अरे, तू वाटेल तेवढी बढाई मारलीस तरी तुझ्या वमाझ्या जाळ्यातील अंतर सगळ्यांना माहीत आहे. गरीब बिचार्‍या निरपराधी प्राण्यांना पकडण्यासाठी तू ते जाळे पसरले आहेस, त्याचेआयुष्य किती क्षणिक आहे बरे? एखाद्या मुलाने हे जाळे पाहिले तर तो एका क्षणात याचा नाश करून टाकेल. उलट माझ्या जाळ्यापासूनजे रेशीम निघेल, त्याची वस्त्रं पुढे एखाद्या राजाच्याही अंगावर बघावयास मिळतील.
तात्पर्य : कोणत्याही वस्तूची किंमत तिच्या मोठय़ा आकारावरून ठरवायची नसून, तिच्या उपयोगावरून ठरवायची असते.


8.सत्ता, संपत्ती यांचा लोभ अमर्यादीत असतो!

मानवी मस्तक आणि पोलादी पाय असणारा तो राक्षसी वृत्तीचा प्राणी जेव्हा सहदेवसमोर आला, तेव्हा त्यालाही जरा आश्चर्य वाटले. जंगलातून भ्रमंती करताना असा माणूस भेटेल असे त्याला स्वप्नातही वाटले नव्हते. सहदेवने त्याला त्याची दिनर्चा, आहार यांविषयी विचारले, तेव्हा तो प्राणी म्हणाला, ‘मी भुखंड खातो आणि समुद्राचे पाणी पितो, तसा मी अत्यंत सुखी आहे. सर्व भौतिक सुविधा मला उपलब्ध आहेत, माझ्या या आहारासाठी मी अनेक भूखंड आरक्षित केले आहेत. पण तरीही मला भविष्याची चिंता छळते आहे.’ यावर सहदेव म्हणाला, ‘कस बां? अशी चिंता तुला का पडावी?’ तो अजब माणूस म्हणाला, ‘आज जरी मला प्रचंड जमीन व अमर्याद पाणी उपलब्ध असले तरी हे सारे गिळंकृत केल्यानंतर काय खाऊ, हा प्रश्न मला छळतो आहे.’
तात्पर्य - सत्ता, संपत्ती आणि सन्मान यांचा लोभही असाच अमर्याद असतो, तो कधीच संपत नाही.


9.कोणत्याही गोष्टीचा अतिरेक नको

एकदा एक राजहंस एका बगळय़ाला म्हणाला, 'काय रे, तू आधाशी! पाण्यातला कोणताही प्राणी खायला तू मागे-पुढे पाहात नाहीस. बरे-वाईट, नासके-चांगले हा फरकसुद्धा तुझ्या खादाड जिभेला समजत नाही. माझे पाहा, मी फक्त पूर्ण उमललेल्या कमळातले तंतू तेवढे खाईन, दुसरा कसलाही पदार्थ माझ्या घशाखाली जाणार नाही.' त्यावर बगळा म्हणाला, 'माझ्या दृष्टीने असा चोखंदळपणा असणे बरे नव्हे. ज्यावेळी जे मिळेल ते खावे अन् सुखी राहावे. खाण्याचा पदार्थ दिसला की, तो खावा हेच शहाणपणाचे.' असे म्हणून बगळा उडाला व जवळच्या तलावाकाठी गेला. तेथे कडेला एक मासा दिसला. तेव्हा विचार न करता त्याने तो एकदम गिळला, पण आत असलेला गळ घशाला लागून तो जिवास मुकला. राजहंस आपले आवडते खाणे खाण्यासाठी दुसर्‍या कमळे असलेल्या तळय़ात गेला, पण तेथे हंस धरण्यासाठी जाळे लावले होते. त्यात तो सापडला.
तात्पर्य : - कोणत्याही गोष्टीचा अतिरेक नको.


10.माणूस श्रेष्ठ की, सिंह श्रेष्ठ

एक माणूस अरण्यात फिरत असता तेथे त्याची एका सिंहाशी भेट झाली. त्यावेळी त्या दोघांनी निरनिराळय़ा विषयांवर बर्‍याच गप्पा मारल्या व त्यामुळे ते दोघे एकमेकांस आवडू लागले. शेवटी मात्र ते 'माणूस श्रेष्ठ की, सिंह श्रेष्ठ?' या विषयावर बोलू लागले व त्याचे वादात रूपांतर झाले. ते दोघेही भांडू लागले. नुसत्या बोलण्याने माणसाचे श्रेष्ठत्व त्या माणसास सिध्द करता येईना, तेव्हा त्याने आपल्याजवळ असलेले शिल्प त्याला दाखविले. सिंहाची आयाळ हातात धरून त्याच्या पाठीवर एक माणूस आहे असे ते शिल्प होते. ते पाहून सिंह त्याला म्हणाला, 'ज्याने हे शिल्प तयार केले तो मनुष्य होता, तोच जर सिंह असता तर माणसाच्या छातीवर बसून सिंह त्याला मारतो आहे, असे त्याने दाखविले असते.


11.सवयी सुटू शकत नाही!

कृष्णेला पूर आला होता. यंदाच्या पावसाळतील हा पहिलाच पूर. पुराचे पाणी पाहण्यासाठी दोन्ही काठांवर गर्दी ओसंडून वाहत होती. त्या गर्दीत पांडुरंगही होता. इतक्यात तेथे असलेला सहदेव ओरडला, ‘अरे पांडुरंग, घोंगडं वाहत चाललं आहे. पाहिलसं का?’ लोभी वृत्तीच पांडुरंगची लालसा चाळवली गेली. त्याने मागचा पुढचा विचार न करता नदीत उडी घेतली. घोंगडेही खूप लांब नव्हते. सात-आठ हात मारून पांडुरंग घोंगडय़ाजवळ गेला. त्याने घोंगडे पकडले. मग मात्र तोच ओरडू लागला, ‘वाचवा! वाचवा!’ तेव्हा काठावर असणारे, त्याला व त्याच्या लोभी वृत्तीला ओळखणारे लोक म्हणाले, ‘अरे, यात ओरडण्यासारखं काय आहे? जर तू ते घोंगडं बाहेर आणू शकत नसशील तर सोडून दे!’ तेव्हा पांडुरंग म्हणाला, ‘अहो, हे घोंगडं नाही, अस्वल आहे. आणि त्यानेच मला पकडलं आहे. कसं सोडू?’
तात्पर्य - आपण सवयींना असेच अगोदर पकडतो, आणि मग सवयी आपणाला पकडतात. मग सुटू शकत नाही.




12.भगवान


एका फकिराला एकदा स्वप्न पडले. स्वप्नात तो स्वर्गात गेला. तेथे रस्त्यावर मोठी गर्दी झालेली त्याला दिसली. त्या गर्दीतील एकाला त्याने विचारले, एवढे लोक का जमले आहेत ? त्या व्यक्तीने सांगितले, आज भगवानांचा जन्मदिन आहे. ते येथून जाणार आहेत. फकिराला आपल्या भाग्याचा हेवा वाटला. साक्षात भगवानाचे दर्शन घडणार. थोड्या वेळाने एका उमद्या घोड्यावरुन एक राजबिंडा तरुण आला. त्याच्यामागे हजारो लोक होते. त्याला पाहून फकिराने विचारले, हेच का ते भगवान ? ती व्यक्ती म्हणाली, नाही हे भगवान नाहीत. हे राम आहेत. त्यांना मानणारे लोक त्यांच्यामागून जात आहेत... याच पद्धतीने येशू, बुद्ध, महावीर... सर्वजण येऊन गेले. भगवानांची वाट पाहता पाहता मध्यरात्र झाली. सारे लोक कंटाळून निघून गेले. आणि त्या निर्मनुष्य रस्त्यावरुन एक म्हातारा एकटाच आला. फकिराने त्याला विचारले, आपणच भगवान ? म्हातारा म्हणाला, हो. फकिराने विचारले, मग आपल्यामागून कोणीच कसे येत नाही ? डोळ्यात अश्रू आणत तो म्हातारा म्हणाला, सारे राम, महावीर, बुद्ध, येशूबरोबर गेले. जो कोणाबरोबर जात नाही, तोच माझ्याबरोबर येऊ शकतो.

मनःशांती


अनेक महापुरुषांनी सांगितलेले उपाय करुन थकलेला एक तरुण विवेकानंदांजवळ आला नि म्हणाला, '' स्वामीजी तासन् तास बंद खोलीत बसून मी ध्यानधारणा करतो, परंतु मनाला शांती लाभत नाही.'' त्यावर स्वामीजी म्हणाले, '' सर्वात प्रथम खोलीचा दरवाजा उघडा ठेव. आपल्या जवळपास राहणार्‍या दुःखी, रोगी व भुकेल्या माणसांचा शोध घे. त्यांना यथाशक्ती मदत कर.'' यावर त्या तरुणाने त्यांना, '' एखाद्या रोग्यासी सेवा करताना मीज आजारी पडलो तर ?'' असा प्रश्न विचारला. विवेकानंद म्हणाले, '' तुझ्या या शंकेमुळे मला असे वाटते की, प्रत्येक चांगल्या कार्यात तुला काहीतरी वाईट दिसते. म्हणूनच तुला शांती लाभत नाही. शुभकार्याला उशीर लावू नये तसेच त्यातील उणिवाही शोधू नयेत. हाच मनःशांती मिळविण्याचा जवळचा मार्ग आहे.''


कवीचा मोठेपणा


ही घटना आहे लखनौमधील ! त्यावेळी महाकवी निराला अमीनाबाद पार्कच्या पुढील मोहल्यात राहात होते. एक दिवशी ते असेच चालले होते. समोर एक टांगेवाला प्रवाशांची वाट पाहत उभा होता. निरालाजींनी त्याला नीट न्याहाळले व विचारले, परवा तूच मला हजरतगंजहून घेऊन आला होतास ना ? तो म्हणाला, होय हुजूर ! माझ्याकडून काही चूक झाली होती का ? निरालाजी सहज म्हणाले, अजिबात नाही. परवा माझ्याजवळ फक्त दोन आणेच होते. तूला आणखी पैसे द्यायला गेले दोन दिवस मी तुला शोधत आहे. हे पैसे ठेव तुझ्याजवळ ! पांच रुपयांची नोट पाहून तो टांगेवाला चांगलाच उखडला.
निरालाजी म्हणाले, अरे रागावू नको. मी चांगल्या भावनने हे पैसे तुला देत आहे. परवा तुझा मुलगा फाटक्या तुटक्या वस्त्रात धावत तुझ्याकडे येऊन एक पैसा मागत होता, पण तोही तू देऊ शकत नव्हतास. ती तुझी असहाय्यता मी विसरु शकलो नाही. म्हणून हे पैसे ठेवून घे व त्या निरागस मुलाचे मन मोडू नकोस. त्या टांगेवाल्याच्या डोळ्यात आनंदाश्रू उभे राहिले. त्याने निरालाजींची क्षमा मागितली.



स्वप्न


देशातील सर्वात मोठ्या वेड्यांच्या दवाखान्याला देशमुखांनी भेट दिली. तेव्हा एका खोलीकडे हात करुन डॉक्टर म्हणाले, '' साहेब, येथे या खोलीत विमान चालविण्याचे, ते वेगाने पळविण्याचे स्वप्न पाहणारे वेडे आहेत.'' देशमुखांनी उत्सुकतेने खिडकीतून आत पाहिले तर त्यांना तेथे कोणीही दिसेना. तसे त्यांनी डॉक्टरांना विचारले. तेव्हा डॉक्टर म्हणाले, '' साहेब, ते सर्व वेडे खोलीतच आहेत. कदाचित पलंगाखाली झोपून, आपण विमानाच्या खालीच झोपलो आहोत, अशी कल्पना करुन विमान दुरुस्त करत असतील.''
आपण सामान्य माणसेही असेच कल्पनांचे, मनोरथांचे विमान पळविण्याच्या आहारी गेलो आहोत. परंतु त्या खोलीत जसे वेडे दिसत नव्हते, तसाच स्वतःचा वेडेपणाही आपल्याला दिसत नाही.


एडिसन


जगदविख्यात शास्त्रज्ञ थॉमस अल्वा एडिसन यांच्या प्रयोगशाळेला १९१४ मध्ये आग लागली. या आगीत त्यांनी आयुष्यभर केलेल्या संशोधनाची कागदपत्रे, यंत्रसामग्री जळून खाक झाली. या आगीची वार्ता समजताच त्यांचा मुलगा चार्ल्स एडिसन त्यांना भेटायला, मदत करायला धावत आला तेव्हा थॉमस एडिसन त्याला म्हणाले, '' अरे पाहत काय उभा राहिलास ? तुझ्या आईला चटकन बोलावून आण. असे दृश्य पुन्हा पाहायला मिळणार नाही.'' दुसर्‍या दिवशी आपल्या आशा - आकांक्षांची आणि स्वप्नांची झालेली ती राखरांगोळी पाहताना ते म्हणाले, '' सारी सामुग्री नष्ट होण्याचे खूप फायदे झाले. त्यामुळे माझ्या चुकाही जळून खाक झाल्या. आता मी नव्या जोमाने कामाला सुरुवात करु शकेन. एका अर्थी ही परमेश्वराची कृपाच म्हणायची !''


यशाचे गमक


महान शास्त्रज्ञ न्यूटन बागेत विचार करीत बसला होता. तितक्यात त्याला नोकराने हाक दिली. महाराज ! न्यूटन विचारात दंग होता. नोकराने पुन्हा साद घातली. महाराज ! आता न्यूटनची नजर नोकराकडे वळली तसा तो नोकर म्हणाला, महाराज ! बाहेर एक गृहस्थ आपणाला भेटण्यासाठी आलेत. ते आपणाला काही प्रश्न विचारु इच्छितात. खूप लांबून आलेत. न्यूटन म्हणाला, पाठव त्यांना इकडे. ते गृहस्थ आत आले.
न्यूटनला म्हणाले, क्षमा करा महाराज, मी अडाणी आहे. आपला लौकिक ऐकून आलोय. मला शहाणं व्हायचं आहे. मी काय करु ? न्यूटन म्हणाला, मित्रा, शहाणं होऊन तू काय करणार आहेस ? या प्रश्नावर तो गृहस्थ म्हणाला, मला तुमच्या यशाचं रहस्य जाणून घ्यायचं आहे. त्याचे उत्तर ऐकून न्यूटन म्हणाला, मित्रा ! एकच महामंत्र लक्षात ठेव. मन सैरभैर होऊ देऊ नकोस. तुला हवं ते ज्ञान मिळेल. पण त्यासाठी न चळणारं अवधान धारण करायला शिक. माझ्या यशाचं रहस्य हेच आहे. एकाग्र मनाला काहीही अशक्य नाही.


दानाचे मोल


राज्यात ओला दुष्काळ पडला होता. राजा प्रतापरावांनी सार्‍या शेतकर्‍यांचा सारा माफ केल्याचे जाहीर केले. अन्नही मोफत दिले जाईल, अशी दवंडी दिली. त्यांना वाटले की, आता सगळे खूश होऊन जातील, आपली स्तुती करतील. ती स्तुती ऐकावी म्हणून धान्य घेण्यासाठी आलेल्या शेतकर्‍यांच्या रांगेत जाऊन ते उभे राहिले. त्यांच्या पाठीमागे दोन शेतकरी येऊन उभे राहिले. ते शेतकरी आपापसांत कुजबुजत होते. आपले महाराज शूर आहेत. दानशूरसुद्धा आहेत पण त्यांना व्यवहार समजत नाही.
दुसरा शेतकरी दबल्या आवाजात म्हणाला, का रे ? फुकटचं धान्य खाऊन वर मस्तीला आलास का ? राजांना नावं ठेवतोस ? पहिला शेतकरी म्हणाला, अगदी बरोबर बोललास. गेले महिनाभर मला काही काम न करता असं फुकटंच खाण्याची सवय लागली आहे. मस्ती आल्याशिवाय कशी राहील ? यापेक्षा महाराजांनी आपल्याकडून श्रमदानाची कामे करुन घ्यायला हवी होती. काम मगच दाम हे धोरण त्यांनी राबवायला हवं होतं. राजा प्रतापरावांनी हा सल्ला मानला. त्यामुळे दानाचा दुरुपयोग टळला.



ईश्वराचे अस्तित्व


ईश्वराने सृष्टीची निर्मिती केली. मानव नावाचा अदभूत प्राणीही निर्माण केला. त्याला तयार करताना मात्र देवाला खूप त्रास झाला. मानवाच्या निर्मितीनंतर हा त्रास वाढू लागला तेव्हा ईश्वराने सार्‍या देवतांना बोलाविले व विचारले, माणसाला तयार करुन मी संकटात सापडलो आहे. मला चोवीस तास हाका ऐकून घ्याव्या लागतात. सारखं वाटतं की, माणूस सतत माझ्या दाराजवळ उभा राहून तक्रार करत आहे. त्यामुळे मला शांतपणे झोपही लागत नाही. मी काय करु ? कोठे लपू ? जेथे माणूस येणार नाही अशी जागा सांगा ? या प्रश्नानंतर ईश्वराला त्या सार्‍या देवतांनी अनेक जागा सुचविल्या. पण ईश्वराला वाटले काहीही करुन माणूस तेथे पोहचणारच. म्हणून त्याने त्या सर्व जागा नाकारल्या अखेर एक म्हातारा देव उठला ! त्याने ईश्वराला कानात काहीतरी सांगितले. ईश्वरालाही ते पटले. त्या वृद्ध देवाने सांगितले होते की, तू माणसाच्या आत हृदयात लपून बैस. ईश्वराने तसे केले आणि तो सुखी झाला.


मातृभक्ती


त्या काळात सर आशुतोष मुखर्जी कलकत्ता विद्यापीठाचे उपकुलपती तर होते शिवाय कलकत्त्याच्या उच्च न्यायालयात न्यायाधिशही होते. त्यांचा साधेपणा, हुशारी, रोखठोकपणा व आदर्श व्यक्तिमत्त्वाने प्रभावित होऊन इंग्रज सरकारने त्यांना इंग्लंडला पाठवण्याचे ठरवले. त्यानुसार परदेशी जाण्याची सर्व तयारी त्यांनी केली पण शेवटच्या क्षणी त्यांच्या आईने काही कारणांमुळे त्यांना इंग्लंडला न जाण्यास सांगितले. आईची आज्ञा शिरसावंद्य मानून एवढ्या चांगल्या संधीकडे त्यांनी पाठ फिरवली व सरकारला कळविले की, माझ्या आईला मी परदेशी जावे, असे वाटत नाही. त्यामुळे मला माझा प्रवास नाईलाजाने रद्द करावा लागत आहे. त्यावेळचा व्हाईसरॉय लॉर्ड कर्झन हे पत्र पाहून अतिशय संतापला व म्हणाला, एका सामान्य भारतीयाची सरकारचा आदेश डावलण्याची हिंमत कशी झाली ? त्याने सर आशुतोष मुखर्जी यांना बोलावले व म्हणाला, जा, आपल्या आईला जाऊन सांगा की भारताचा व्हाईसरॉय तुमच्या मुलाला परदेशी जाण्याची आज्ञा देत आहे. त्यावेळी व्हाईसरॉयची आज्ञा न मानणे म्हणजे स्वतःवर संकट ओढवून घेण्यासारखे होते, पण आईच्या आज्ञेपुढे त्यांना कर्झनच्या आज्ञेची किंमत शून्य होती. ते आपल्या निश्चयापासून जराही विचलीत झाले नाहीत व गंभीर चेहर्‍याने व धाडसाने म्हणाले, महाशय, मी माझ्या आईच्या आज्ञेचे उल्लंघन करु शकत नाही. जगात आईच्या आज्ञेशिवाय कोणाचीही आज्ञा श्रेष्ठ मानत नाही. आमची परंपरा व संस्कृती आईला देवता म्हणून मानते व अशा देवीची आज्ञा माझ्या जीवात जीव असेपर्यंत मी मोडू शकत नाही. तेव्हा यासंबंधी कृपया आपण मला अधिक काहीही सांगू नका ! हा विषय माझ्या दृष्टीने संपला आहे. त्यांची मातृभक्ती पाहून कर्झन आश्चर्यचकित झाला व त्यांना प्रेमाने आलिंगन दिले.



नैतिकतेचा आदर्श


आयुर्वेदाचे प्रणेते महर्षी चरक औषधी वनस्पतींच्या शोधात आपल्या शिष्यासह रानावनांत, जंगलात च दर्‍या डोंगरावरुन हिंडत चालले होते. चालता चालता अचानक त्यांची दृष्टी समोर हिरव्यागार शेतात उगवलेल्या एका सुंदर फुलाकडे गेली. आजपर्यंत त्यांनी असे आगळेवेगळे अनुपमेय सुंदर फूल कधी पाहिलेच नव्हते. त्यांना फूल स्वतःजवळ हवेसे वाटू लागले. पण संस्कारामुळे मन तसे करण्यास धजावत नव्हते. मनात चलबिचल होत होती. त्यांची ही अवस्था शिष्याच्या लक्षात आली. शिष्य त्यामना विनम्रपणे म्हणाला, गुरुवर्य आपली आज्ञा झाली तर ते फूल मी आपल्या सेवेस अर्पण करु ?
महर्षी चरक म्हणाले, वत्सा ! त्या फुलाची मला निश्चितच गरज आहे. पण या शेताच्या मालकाच्या परवानगीशिवाय ते घेणे म्हणजे चोरी करणे ठरेल. महर्षीच्या या उच्च आदर्शवाद व नैतिकतेपुढे शिष्यांनी मान खाली घातली.
ते पुढे म्हणाले, शिष्यांनो, नैतिक जीवन व राजाज्ञा यात कोणतेच साम्य नाही. जर त्याने आपल्या प्रजाजनांची संपत्ती स्वच्छंदपणे व मनमानी करुन स्वतःकरता वापरली तर नैतिकतेचा आदर्श तो काय राहणार ? यानंतर महर्षी आपल्या शिष्यांसह तेथून तीन मैल अंतरावरील त्या शेतकर्‍याच्या घरी पायी गेले व त्याची परवानगी घेऊनच त्यांनी ते फूल तोडले.


महापुरुष


आधुनिक संत म्हणून ज्यांना संबोधण्यात येते ते आचार्य विनोबा भावे यांच्या संदर्भातील एक गोष्ट अशी की, आपले म्हणणे दुसर्‍यांना न दुखवता मोठ्या खुबीने आचरणाने पटवून देण्यात त्यांचा हातखंडा होता. एके दिवशी असाच एक माणूस त्यांच्याकडे आला व पश्चात्तापदग्ध होऊन म्हणाला, महाराज दारु काही मला सोडायलाच तयार नाही. मला माहिती आहे की ती सवय वाईट आहे. मला ती सवय सोडायची आहे पण काय करु ? आचार्य शांतपणे म्हणाले, असं कर, तू उद्या मला याचवेळी येऊन भेट व बाहेरुनच हाक मार. मी मग येऊन सांगेन काय ते ! दुसर्‍या दिवशी तो माणूस ठरल्याप्रमाणे आला पण त्याला कळेना की बाहेरुनच का हाक मारायची ? पण आचार्यांची आज्ञा म्हणून अधिक विचार न करता त्याने बाहेरुनच हाक मारुन स्वतः आल्याचे सांगितले. तोच आतून आचार्यांचा आवाज आला, होय रे, मी बाहेर येऊ पाहतोय, पण हा खांबच मला सोडायला तयार नाही. तो माणूस चक्रावून गेला. ही काय भानगड आहे ? आचार्य माझी गंमत तर करत नाहीत ? असा विचार करुन त्यांनी आत कुतूहलाने डोकावून पाहिले. तो त्याला हसूच आवरेना. घरातील खांबाला विनोबाजी घट्ट पकडून बसले होते व तो खांब मला सोडत नाही म्हणून तक्रार करत होते. तो माणूस हात जोडून म्हणाला, विनोबाजी आपणच खांबावर चढून त्याला धरले आहे व तो खांब सोडत नाही, हे कसे ? हे ऐकूण स्मितहास्य करत खाली उतरले व त्याला समजावणीच्या स्वरात म्हणाले, ज्याप्रमाणे मी या खांबाला धरुन ठेवले होते तसेच तू ही दारुला पकडून ठेवले आहेस. दारुने तुला नाही पकडले. जेव्हा तू दारु सोडायचे ठरवशील तेव्हा आपोआप दारु पिच्छा सोडेल. हे ऐकून त्या माणसाचे डोळे उघडले व त्यांनी विनोबाजींच्या पायावर डोके ठेवून दारु सोडण्याचा निश्चय केला.


विश्वासाचा सुगंध


चित्तरंजन हे अतिशय हुशार परंतु कट्टर नास्तिक गृहस्थ म्हणून सर्वजण त्यांना ओळखत. म्हणूनच सहदेव महाराजांच्या कीर्तनाला त्यांना आलेले पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटले. सहदेव महाराज तर धर्माची, ईश्वराच्या अस्तित्वाची महती सांगणारे. आणि अशा धार्मिक विषयाशी संबंधित कार्यक्रमाला चित्तरंजन कसे काय आले ? हे कसे काय शक्य आहे ? म्हणून सर्वत्र मित्र काहीसे अचंबितच झाले. त्यांच्यापैकी एकाला न राहवल्याने त्याने अखेर चित्तरंजन यांना विचारलेच, '' भक्तिमार्गाची प्रवचने, कीर्तने ऐकायला जाणे आपल्याला पटते का ? आपल्या तत्त्वात ते बसते का ? नसेल तर आज येथे येण्याचे कारण काय ?''
चित्तरंजन म्हणाले, '' त्याचे असे आहे की, सहदेव महाराज आपल्या प्रवचनात जे सांगतात, त्यावर माझा मुळीच विश्वास नाही. परंतु आपण जे जे बोलतो, त्यावर महाराजांचा दृढ विश्वास आहे. आणि ज्याचा स्वतःच्या बोलण्यावर दृढ विश्वास आहे, अशा व्यक्तीचे बोलणे समजून घ्यायला मला आवडते.''


मदत


अमेरिका स्वतंत्र झाल्यानंतरची घटना. रस्त्याच्या कडेने जात असताना लष्कराची गाडी अडचणीच्या जागेत अडकली होती. आतील शिपाई उतरुन तिला बाहेर काढण्याचा प्रयत्न करु लागले. त्यांच्यावरचा अंमलदार फक्त हुकूम देत होता.
त्याने मदत केली असती तर गाडी नक्की निघाली असती पण तो होता साहेब ! फक्त हुकूम देत उभे राहणेच त्याने पसंत केले. तेवढ्यात तिकडून एक गाडी आली.
त्या गाडीतून एक सज्जन उतरला. त्याने सैनिकांना प्रत्यक्ष हातभार लावला. गाडी अडचणीतून बाहेर पडली. दुसर्‍या गाडीतून आलेला तो सज्जन अंमलदार साहेबाला म्हणाला, पुन्हा गरज पडली तर मला बोलवत जा आणि त्याने आपल्या कोटाच्या खिशात हात घातला. आपला पत्ता असलेले कार्ड बाहेर काढले व त्या अंमलदारला दिले.
त्याने ते सहज म्हणून वाचले. त्याला दरदरुन घाम फुटला. कारण मदतीला आलेला तो सज्जन अमेरिकेचा सर्वेसर्वा अध्यक्ष जॉर्ज वॉशिंग्टन होता.



उज्ज्वल भवितव्यासाठी


एका उद्योगपतीने आपल्या कारखान्यात उच्च तंत्रज्ञान घेऊन आलेल्या एका इंजिनीयरची नेमणूक केली. त्याने आल्यावर महिन्याभरातच सार्‍या मशिन्स ठाकठीक केल्या. मशिन्सची काळजी कशी घ्यायची याचेही प्रशिक्षण त्याने कामगारांना दिले. दोन - तीन महिने झाले. त्याला काही कामच नव्हते. तो मालकाला भेटला. म्हणाला, सर ! मला तुम्ही मला फुकट पगार का देता ? सर्व मशिन्स व्यवस्थित सुरु आहेत. आता मी नसलो, तरी कारखाना ठिक चालेल. मालक म्हणाले, ते सर्व ठिक आहे. आज कारखान्यातली यंत्रं व्यवस्थित आहेत पण उद्या यातलं एखादं जरी मशिन बिघडलं, तरी माझं लाखो रुपयांचं नुकसान होईल. त्यावेळी मी तुला कुठे शोधू ? म्हणूनच उद्या बिघडणार्‍या मशिन्सच्या दुरुस्तीसाठी मी तुझी आजच व्यवस्था करुन ठेवली आहे. मी काय मूर्ख आहे, तुला पैसा फुकट द्यायला !



मनाची एकाग्रता


पांडुरंग ' मनाची एकाग्रता कशी करावी ' या विषयाचा अभ्यास करत बसला होता. त्याला जो कोणी भेटावयास येई, त्याच्याकडे तो दुर्लक्ष करायचा. आपल्याच चिंतनात मग्न असायचा. एकदा त्याचे गुरु सहदेव महाराज त्याच्याकडे आले. पाहतात तर पांडुरंग शून्यात नजर लावून बसलेला ! पांडुरंगाचे आपल्या गुरुकडे लक्षही नव्हते. सहदेव महाराज मात्र न रागावता तेथेच थांबले. त्यांनी एक वीट आणली आणि दिवसभर ती वीट एका दगडावर घासत बसले. शेवटी न राहवून पांडुरंगाने महाराजांना विचारले, '' महाराज आपण हे काय करता आहात ?'' सहदेव म्हणाले, '' मला या विटेचा आरसा बनवायचा आहे.'' पांडुरंग म्हणाला, '' महाराज, या विटेला घासून कधी आरसा होईल का ? जीवनभर घासत बसले तरीही विटेचा आरसा होणार नाही.'' ते ऐकून सहदेव हसले. म्हणाले, '' मग तू तरी काय करत आहेस ? वीट जर आरसा होत नसेल, तर मनाचे तरी काय ? मनावरील धूळ जोपर्यंत जात नाही, तोपर्यंत साधना करुन तरी काय उपयोग ?



उशिरा येण्याची शिक्षा


महात्मा गांधी नियमांचे पालन अतिशय काटकोरपणे करत असत. ते प्रत्येक नियम मोठ्या विचारपूर्वक तयार करत असत. स्वतः ही काटेकारपणे पालन करीत. त्यांच्या आश्रमात जेवणासाठी हजर राहण्यासाठी दोन वेळा घंटा वाजवून सूचना देण्यात येत असे. जो दुसर्‍या घंटेनंतर येत असे त्याला दुसर्‍या पंक्तीत बाहेर उभे राहावे लागत असे. अगदी त्या पंक्तीत जागा रिकामी असली तरी ! गांधीजी त्यास उशिरा येण्याची गोड शिक्षा संबोधत असत. दुसर्‍या घंटेनंतर नियमाप्रमाणे भोजनगृहाचे दरवाजे बंद केले जात असत. मग कोणालाही आत प्रवेश नसे. एकदा स्वतः गांधीजींना उशीर झाला. दरवाजा बंद करणारे आश्रमवासी गांधीजींना येताना पाहून घुटमळले. तेवढ्यात महादेव भाईंनी त्यांना सांगितले, काय आपल्याला बापूजींकडून शिक्षा घ्यायचीय का ? लवकर दरवाजा बंद करा . नियमाप्रमाणे गांधीजीं व्हरांड्यात उभे राहिले.
नियमांचे पालन होत आहे हे पाहून त्यांना अतिशय आनंद झाला. त्याचवेळी तेथे हरिभाऊ उपाध्याय आले व बापूजींना उभे पाहून म्हणाले, बापूजी, आज आपणही गुन्हेगारांच्या रांगेत आलात ? जेवणास उशिरा आल्यामुळे ही गोड शिक्षा तुम्हालाही भोगावी लागत आहे.



वडिलांना मदत


भगवान बुद्ध त्या काळात आपल्या शिष्यगणांसह गावोगावी जात होते. एका गावाच्या वेशीवर एक वृद्ध आपल्या मोठ्या टोपलीतून भाजी विकण्यास बसला होता.
ती टोपली जड होती व त्याला तेथून दुसरीकडे जायचे होते म्हणून येणार्‍या - जाणार्‍या वाटसरुंना तो आपल्या डोक्यावर टोपली ठेवण्यास मदत करण्याची याचना करत होता. पण कोणीही त्याच्याकडे लक्ष देत नव्हते. ते शिष्यगणही मजा बघत होते. हे पाहताच भगवान बुद्ध स्वतः पुढे झाले व त्यांनी वृद्धाच्या डोक्यावर टोपली उचलून दिली. त्या वृद्धाने त्यांना ओळखले होते.
तो म्हणाला, सार्‍या जगाच्या दृष्टीने ते कोणीही असोत, पण माझ्या दृष्टीने माझ्या मुलासारखे आहेत ! त्याचे बोलणे ऐकून शिष्य आश्चर्यचकित झाले. त्यांनी विचारले, हे कसे शक्य आहे ? तो वृद्ध उत्तरला, जगात प्रत्येक मुलगा हा आपल्या मातापित्यांचा आधार असतो. त्यांचे कष्ट उपसण्यास नेहमीच मदत करत असतो.
आज त्यांनीही मला मदत केली आहे. माझे कष्ट हलके केले आहेत. मग ते माझ्या मुलासमानच नाहीत का ? सार्‍या शिष्यांनी त्या वृद्धाचे पाय धरले व क्षमा मागितली.


वडिलांना मदत


भगवान बुद्ध त्या काळात आपल्या शिष्यगणांसह गावोगावी जात होते. एका गावाच्या वेशीवर एक वृद्ध आपल्या मोठ्या टोपलीतून भाजी विकण्यास बसला होता.
ती टोपली जड होती व त्याला तेथून दुसरीकडे जायचे होते म्हणून येणार्‍या - जाणार्‍या वाटसरुंना तो आपल्या डोक्यावर टोपली ठेवण्यास मदत करण्याची याचना करत होता. पण कोणीही त्याच्याकडे लक्ष देत नव्हते. ते शिष्यगणही मजा बघत होते. हे पाहताच भगवान बुद्ध स्वतः पुढे झाले व त्यांनी वृद्धाच्या डोक्यावर टोपली उचलून दिली. त्या वृद्धाने त्यांना ओळखले होते.
तो म्हणाला, सार्‍या जगाच्या दृष्टीने ते कोणीही असोत, पण माझ्या दृष्टीने माझ्या मुलासारखे आहेत ! त्याचे बोलणे ऐकून शिष्य आश्चर्यचकित झाले. त्यांनी विचारले, हे कसे शक्य आहे ? तो वृद्ध उत्तरला, जगात प्रत्येक मुलगा हा आपल्या मातापित्यांचा आधार असतो. त्यांचे कष्ट उपसण्यास नेहमीच मदत करत असतो.
आज त्यांनीही मला मदत केली आहे. माझे कष्ट हलके केले आहेत. मग ते माझ्या मुलासमानच नाहीत का ? सार्‍या शिष्यांनी त्या वृद्धाचे पाय धरले व क्षमा मागितली.



सत्य


पांडुरंगरावांना तीन मुली होत्या. सुस्वरुप, गृहकर्तव्यदक्ष अशा त्या मुलीमध्ये एकच व्यंग होते. त्या तिघीही मुली बोबड्या होत्या. यांचे विवाह कसे होणार, या एकाच चिंतेने पांडुरंगला अस्वस्थ केले होते. एकदा या तिघींना पाहायला तीन मुले येणार होती. म्हणून पांडुरंगने त्या तिघींना ताकीद दिलेली होती की, पाहुण्यासमोर कुणीही बोलायचे नाही. ठरल्याप्रमाणे पाहुणे आले. चहा - फराळाचे पदार्थ दिले गेले. त्यांचा आस्वाद घेत वधूपरीक्षा सुरु झाली. काहीतरी बोलायचे म्हणून त्या मुलांसोबत आलेले गृहस्थ म्हणाले, वा ! पदार्थ फारच छान झालेत. तुमच्यापैकी कोणी केलेत हे ? यावर थोरली मुलगी लाजत - लाजत म्हणाली, आईने केये नाईट, आमीट केये. धाकटी मुलगी तिच्यावर रागावून म्हणाली, अगो बाबांनी काय शांगिटले ? बोलायचे नाही म्हणून. यावर मधली म्हणते कशी, ही बोबयी. तू पण बोबयी. पण मीच नाही बोबयी. तिघींच्या संभाषणावरुन त्यांना बघायला आलेल्या वरमंडळींना त्यांच्या व्यंगाबाबतचे गुपित आपोआपच समजले आणि त्यांनी ठरवलेले सर्वकाही उघडकीस आले. पांडुरंगाची तर त्रेधातिरपीट उडाली. वर पक्षाच्या मंडळींनी तर आपोआपच काढता पाय घेतला.


जनतेचा माणूस


एकदा लालबहादूर शास्त्रीजी नैनी येथे गेले होते. तेथे सरकारतर्फे एक औद्योगिक नगर वसविण्याचे प्रयत्न चालू होते. तेथील पूर्वीपासून चालू असलेल्या कारखान्यांचे निरिक्षण करुन टबे बनविणार्‍या कारखान्यालाही भेट देण्यासाठी ते तेथे गेले. त्या कारखान्याचे वैशिष्ट्य असं होतं की पॅकींगपर्यंतचे काम मशीनवर असे. शास्त्रीजींना पूर्ण कारखाना दाखवल्यानंतर वर असलेल्या मोठ्या गच्चीवर नेण्यात आले. तेथे अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी मऊ आसनांच्या खुर्च्यांची सोय केली होती. कामगारांना बसण्यासाठी खाली एक मोठी सतरंजी घालून ठेवली होती. त्यावर सर्व कामगार नेहमीप्रमाणे बसले होते. शास्त्रीजी तेथे पोहचताच सर्व उपस्थितांनी उभे राहून त्यांना अभिवादन केले व स्वागतासाठी सर्व पुढे आले. सर्वजण नंतर खाली बसले व शास्त्रीजींना त्यांच्या आसनाकडे घेऊन जाण्यासाठी कारखान्याचे पदाधिकारी मागे वळले, तो काय ? त्यांच्यावर आश्चर्यचकित होण्याची वेळ आली. शास्त्रीजीनी चटकन काही कळायच्या आतच त्यांनी खुर्चीवर बसण्यास नकार दिला व गंभीरपणे म्हणाले, मी या जनतेचा माणूस आहे. माझी खरी जागा येथेच आहे. ती खुर्ची नाही !


वेळेचे महत्त्व


क्रांतिकारकांच्या मालिकेत चाफेकर बंधूचे नाव मोठ्या आदराने घेतले जाते. तीनही भाऊ देशाच्या स्वातंत्र्याकरिता हंसत हंसत फासावर चढले. त्या दिवशी दामोदार चाफेकर यांना सरवरा जेलमध्ये फाशी देण्यात येणार होती. दामोदरांनी त्या दिवशी प्रसन्न व आनंदी होते. त्यांच्या हातात गीतेचे पुस्तक होते. ते गीतेचे वाचन करता करता शिक्षेकरता तयार झाले होते. फासीची वेळ होत होती पण इंग्रज अधिकारी सुस्त होते. इंग्रज अधिकारी दामोदरजींना फाशी देण्याच्या ठरल्या वेळेपेक्षा पाच सात मिनिटे उशीरांनी त्यांच्याजवळ आले. इंग्रज सरकारची ही बेपर्वाई दामोदरजींना खूपच खटकली. त्यांनी सहज शब्दांत त्यांची निर्भत्सना करत म्हटले, मी तर समजत होतो की इंग्रज सरकार वेळ पाळण्याच्या बाबतीत अतिशय काटेकोर आहे. पण माझी ही समजूत आज चुकीची सिद्ध झाली. फाशीच्या दिवसाची प्रतीक्षा करणार्‍या व्यक्तीला ठरल्या वेळेनंतरही वाट पहावी लागणेयाची इंग्रज सरकारला लाज वाटली पाहिजे. तो दिवस आता पार दूर नक्कीच नाही की ज्या दिवशी भारतीयांच्या हाती शासनाचा कारभार येईल. तेंव्हा इंग्रजी अधिकारी त्यांना स्पष्टीकरण देण्याचा खूप प्रयत्न केला.